Sunday, 28 October 2012

एकांत...



     "एकांत" ... माझे मन आणि माझी बुद्धी आयुष्यभर एकमेकांशी भांडत आले आहेत. जरा म्हणून गप्प बसवत नाही त्यांना. दोन्ही अर्थांनी म्हणा.. पण "दुसऱ्याचे" विचार हाणून पाडणे एवढेच काम करायचे असा दोघांचाही मनोनिग्रह असतो. "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ" हि म्हण केवळ म्हणायलाच ठीक आहे. कारण हे दोघे जेंव्हा भांडायला लागतात तेंव्हा माझी मात्र मधल्या मधे फरपट होते... निष्कारण. जिंको कुणीही, माझा मात्र गोंधळ उडतो.

    कोणताही  निर्णय घ्यायची वेळ आली की हे दोघे जण नेमके टपकतात. दोघांच्याही मनात आसुडाची भावना जागी होते आणि रणकंदन माजते. उमजत नाही मग अशा वेळी काय करायचे आणि "बावळट" या विशेषणाने माझी ख्याती आणखी पसरत जाते.

    ज्याचे वर्चस्व उरेल त्याचा तो निर्णय मग "एक"मताने घेतला जातो. आणि निर्णय तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्या दोघांमधला एक जण जिंकत नाही. हार मानणे दोघांच्याही रक्तात नाही... त्यामुळे समोरच्याचा अंत करूनच इथे किलमिष संपते... कदाचित म्हणूनच त्याला म्हणत असावेत "एकांत".. एकाचा अंत..

   म्हणूनच का असेना पण माझ्या विचारांना त्यांच्या वाहणाऱ्या रक्ताची संवेदना आहे... त्याचीच एक उपरती या चार ओळीत..



जन्मांतरीच्या नात्यांची
एक गोधडी माझ्या उराशी
फुका कलह मात्र मनाचा
सूर जुळेल का त्यांच्या सुराशी ?

हा असा तर ती तशी परी गुंफिले
मी सारे मणी एका धाग्याशी
मन विचारे काय साधशी करून यत्न
रगडण्याचे त्या निष्फळ वाळू कणांशी?

मना तुझ काय ठावे भय बांडगुळाचे?
त्याचा देखील जीव जातो त्याच्या दात्यासंगे
उत्तरी मन, हरवला तुझा स्वाभिमान
तुझ हौस नवखी म्हणुनी माळूनी घेशी परवशाचे फांद्ये

बोलून चालून माझेच मन ते
कसे ऐकेल माझ्या बोलांशी
बाली-सुग्रीव द्वंद्व पेटले मग
माझेच माझ्या मनाशी...